Destiny म्हणजेच नियतीच्या उदरात यात जे काही दडलंय ते कोणालाच ठाऊक नाही. जे जाणण्याचा जो प्रयत्न करतो त्याला कधी यश तर कधी अपयश प्राप्त होते. खरंतर तिच्या रचनेत ढवळा ढवळ करणे हि तिला केव्हाच मान्य नसते, परंतु मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी ती चूक करीत असतो. प्रत्येकवेळी नियती हि आपल्याला सांकेतिक खुणा देऊन मार्गदर्शन करीत असते. परंतु आपण मोहपाशात आशेच्या मागे हिंडत असतो. नाना गाऱ्हाणी आपण देवाकडे मागून नियतीच्या रचनेत हस्तक्षेप करीत असतो.
नियतीच्या उदरात
व्यक्ती, गुरु, देव यांना वेळप्रसंगी वेठीस धरून आपल्या मनोकामनेसाठी आपण कधीकधी नीतिमत्तेचा ऱ्हास करतो. जो आपल्या मनाविरुद्ध जाईल तो वाईट आणि मनासारखा वागेल तो चांगला, अशी आपली धारणा होऊन बसली आहे. कर्माचे फळ कधी मिळतच नाही तर कधी ते तात्काळ आपल्यासमोर हाथजोडून उभे असते.. येथूनच नैराश्याच्या भूमिकेसाठी सुरुवात होते.

मातेच्या उदरात जन्माला येऊ पाहत असलेले बाळ, ह्याचे लिंग तपासणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच नियतीच्या उदरात यश/अपयश शोधणे हे ही कालबाह्य नियम आहे. काही माझ्यासारखे साधक किंवा इतर ज्योतिषी आपल्याकडे आलेल्या याचकांसाठी हा नियम अगदी सोयीस्कररित्या बाजूला सारतात. खरंतर याच्या प्रतिकूल/अनुकूल फळाची जबाबदारी स्वतःची असते.
गर्भात असलेले बाळ अचानक मृत्यूच्या विळख्यात येते, तसेच नियतीच्या गर्भात असलेले आपले यश/अपयश याची गळचेपी होते. विश्वास-श्रद्धा-जिद्द-संयम यांची दाणादाण उडते. देवालाही शिव्यांची लाखोली खावी लागते. परंतु ती नियती जी आदिमायाशक्ती आहे ती या आपल्या सारीपाटावर लक्ष ठेऊन असते. अगदी स्थिर-शांत-अचल अशा भूमिकेत असताना ती आपली एक एक प्यादी पुढे सरकवत असते.
अनेक जिवातील मनुष्य हाही एक नियतीचाच भाग आहे. जो मनुष्य नियतीच्या गतीचक्राने प्रवास करतो तो संतुष्ट असतो. ज्याने याचा विरोध केला तो मानाने, वयाने, धनाने, रूपाने, ज्ञानाने कितीही श्रेष्ठ असला तरी त्याच्या पदरी नैराश्य येते. Other blogs

सुखाच्या मागे धावता धावता तो नीतिमत्तेला सहजच बगल देत असतो. हल्लीतर सुखाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. घरातील व्यक्तीला सुप्रभात बोलायला सुद्धा मोबाईलचा आधार घ्यावा लागतो. काय गंमत आहे पहा महामारीच्या काळात आपले स्वतःचेच अंग अस्पृश्य वाटू लागले. जिवलग नकोसे झाले. जीव जगण्यासाठी झगडत होता, आणि आत्मा व्याकुळ-स्पंदहीन झाला. क्षणभर महाभारतातल्या युद्ध समाप्ती नंतरची कुंती आठवली.
नियती तेव्हाही होतीच, आणि ती याही पुढे चिरकाल आहेच, वेळ फक्त आपल्याकडेच कमी आहे, कर्म आ वासून बसले आहे, जन्माचे सार्थक कशात आहे याचा भ्रंश झाला आहे. गड्या अजूनही वेळ गेलेली नाही, डाव तुझ्याच हातात आहे हे नियती सांकेतिक खुणेने सांगतेय, पर्यावरण, प्रकृती, संस्कार, याचे भविष्य तुझ्याच हाती आहे. हे जाणण्यासाठीच एक जन्माचा अवधी तुला नियतीने बहाल केला आहे.
तिची कृपा आहे तोवर ठीक अन्यथा, अग्नितांडव, त्सुनामी, वादळं या माध्यमातून ती आपल्याला सहज संपवू शकते. डाव तिने मांडला आहे पण चाल तुमची आहे तेव्हा आपले पाऊल कुठे पडले पाहिजे हा तुमच्या बुद्धीचा कस आहे बाकी आपण सुजाण आहातच..! Other blogs